येवल्याजवळ अपघातांत तीन ठार

तालुक्यातील वेगवेगळ्या दोन अपघातांत तीन ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गवंडगावजवळ झालेल्या अपघातात साखरपुड्याला निघालेल्या नवरदेवावरच काळाने झडप घातली. येवला शहरात झालेल्या दुसर्‍या अपघातात एका नवरदेवाच्या काकाचा मृत्यू झाला. या अपघातांमुळे शेख व बाकळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे
येवला वैजापूररोडवरील गवंडगावजवळ सकाळी 10.30 वाजता झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले. कल्याण येथील अश्पाक बशीर शेख याचा वैजापूर येथे साखरपुडा होता. तो कुटुंबीय व मित्रांसह साखरपुड्याच्या कार्यक्रमास चालला होता. नवरदेव स्वत: गाडी चालवत असताना गवंडगावजवळ टाटा आर्या (एमएच 04 एफ ए) या गाडीचे पुढचे टायर फुटल्याने गाडी नदीचे कठडे तोडून खाली पडली. यात नवरदेव अश्पाक शेख जागीच ठार झाला. याच अपघातात जखमी झालेला त्याचा मित्र असिफ बाबू यास ग्रामीण रुग्णालयात व तेथून नाशिकला हलवत असताना मृत्यू झाला. याच अपघातात मोहंमद अक्रम हुसेन, जुबेर अहमद सिद्दीकी, कादीर इब्राहिम शेख, समीर जमीर पठाण, सुरेश मणी अलेक्झांडर यांना उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.  
दुसरा अपघात येवल्यातील सिद्धार्थ लॉन्सजवळ घडला. या ठिकाणी दुपारी 12 वाजता विजय बाकळे यांचा विवाह होता. लग्नाची तयारी सुरू असताना नवरदेवाचे काका किरण बंडूसा बाकळे (48, रा. फकीरवाडी, औरंगाबाद) हे आपल्या बहिणीला घेण्यासाठी 10 वाजता चाललेले असताना रस्ता दुभाजकाजवळ मनमाडकडून येणार्‍या ट्रकने (एमएच 38 क्यूओ 411) धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेने बाकळे कुटुंबीयावर शोककळा पसरली होती. बाकळे हे पेट्रोलपंपावर नोकरी करीत होते.

थोडे नवीन जरा जुने