राजापूर दरोड्यातील मुख्य संशयित गुन्हे शाखेच्या ताब्यात

येवला तालुक्यातील राजापूर येथे महिन्याभरापूर्वी केशव भालके यांच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकून त्यांचा खून करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीतील मुख्य संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने वैजापूर येथून ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
८ एप्रिल रोजी मध्यरात्री ही घटना घडली होती. सशस्त्र दरोडेखोरांनी भालके यांच्या घरावर दरोडा टाकून लोखंडी गजाने भालके व त्यांच्या पत्नी शोभाबाई यांना बेदम मारहाण केली या मारहाणीत केशव भालके हे जागीच ठार झाले, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या. दरोडेखोरांनी यावेळी भालके यांच्या पत्नीच्या अंगावरील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे ९० हजारांचा ऐवज लुटून नेला होता. दरम्यान, या घटनेने प्रचंड खळबळ उडून पोलिसांच्या निष्क्रियतेविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला होता. दरोडेखोरांची गुन्ह्याची पद्धत व त्यांच्या वर्णनाच्या आधारे गेल्या महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. साधारणत: औरंगाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी दरोडेखोर आश्रयास जात असल्यामुळे पोलिसांना त्यांचा माग घेण्यात अडचणी येत होत्या. दोन दिवसांपूर्वी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वैजापूर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून साईराम ऊर्फ सायऱ्या जैनू काळे (२७) रा. बिलोणी, ता. वैजापूर यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने राजापूर येथे साथीदारांसमवेत दरोडा टाकल्याची कबुली दिली. तसेच नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे आप्पा वाळू गुंजाळ यांच्याकडे फेब्रुवारी महिन्यात धाडसी घरफोडी करून सुमारे ५० हजाराचा ऐवज चोरून नेल्याचीही माहिती दिली.
संशयित आरोपी सायऱ्या काळे याच्याविरुद्ध अन्य पोलीस ठाण्यांमध्येही दरोडा, जबरी लूट, घरफोडीचे गुन्हे दाखल असून, त्याच्या अटकेमुळे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलीस त्याच्या फरार साथीदारांची माहिती गोळा करीत आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास शेळके, उपनिरीक्षक आगारकर, हवालदार नरेंद्र सौंदाणे, रवींद्र वानखेडे, सतीश बैरागी, रवींद्र भागवत, संजय गोजरे आदि करीत आहेत.
थोडे नवीन जरा जुने